मुंबईतील गोरेगावमधील सन्मित्र मंडळ या शैक्षणिक संस्थेचे २०१७-१८ हे हीरक महोत्सवी वर्ष आहे. पाच विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या या संस्थेच्या शाळांत आज १११० विद्यार्थी शिक्षण घेतात. हीरक महोत्सवानिमित्ताने १६ डिसेंबर २०१८ रोजी गोरेगावात भव्य स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. या स्नेहसंमेलनाचा संस्थेचे खजिनदार अजित वर्तक यांनी घेतलेला हा आढावा...............
१९५७ साली गोरेगाव ही ग्रामपंचायत होती आणि गावाची लोकसंख्या वीस हजारांच्या आसपास असावी. गोगटेवाडी परिसरात वस्ती वाढत होती आणि शिक्षणाच्या सोयीची गरज लोकांना जाणवू लागली. त्यातूनच ‘सन्मित्र मंडळ, गोरेगाव’ या संस्थेचे बीज रोवले गेले. नूतन शिशुमंदिर या पूर्व प्राथमिक विभागाच्या पाच विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या या संस्थेचा आज वटवृक्ष झाला आहे. आज नूतन शिशुमंदिर (९३ विद्यार्थी), बैरामजी जीजीभॉय प्राथमिक शाळा (३०४ विद्यार्थी) आणि सन्मित्र मंडळ विद्यामंदिर (७१३ विद्यार्थी) यांची मिळून एकूण विद्यार्थिसंख्या १११० एवढी आहे. एकीकडे मराठी शाळा बंद होत असताना ‘सन्मित्र मंडळ, गोरेगाव’चा आलेख मात्र उंचावत आहे.
अद्ययावत संगणक कक्ष, आधुनिक प्रयोगशाळा, प्रत्येक वर्गात ‘ई-लर्निंग’ची सुविधा अशा नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून सुयोग्य शिक्षण येथे दिले जात आहे. मराठी माध्यम असूनही गणित व शास्त्र हे विषय इंग्रजीमध्ये (सेमी इंग्लिश) शिकविले जातात आणि इंग्रजी संभाषण वर्गासारख्या अन्य उपक्रमांची जोड दिल्यामुळे मुले पुढील महाविद्यालयीन जीवनात कुठेही कमी पडत नाहीत.
सन्मित्र मंडळ या संस्थेचा रजतमहोत्सव १९८३मध्ये, सुवर्णमहोत्सव १९९८मध्ये साजरा झाला. २०१७-१८ हे संस्थेचे हीरक महोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. २०१७-१८ या शालेय वर्षाच्या सुरुवातीपासून वर्षभरासाठी अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. शाळेतील शिक्षकांसाठी योगप्रशिक्षण, संगणक प्रशिक्षण, आर्थिक नियोजन अशा विविध विषयांवर विविध कार्यशाळा आयोजित केल्या होत्या. परिसरातील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी शारीरिक आणि बौद्धिक कस पाहणाऱ्या स्पर्धा आणि शिक्षकांसाठी गीतगायन स्पर्धा आयोजित केल्या होत्या. गोरेगाव, मालाड व जोगेश्वरी परिसरातील १५ शाळांनी या स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन उत्तम प्रतिसाद दिला. हीरक महोत्सवाचे स्मृतिचिन्ह माजी विद्यार्थी सुहास सावंत यांनी साकारले.
या कार्यक्रमाच्या मालिकांतील शिरपेच म्हणून १६ डिसेंबर २०१८ रोजी एक भव्य स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. १११० विद्यार्थी, त्यांचे पालक, आजी-माजी शिक्षक, मंडळाचे सभासद, गोरेगावातील इतर संस्थांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक, अन्य मान्यवर आणि लोकप्रतिनिधी असे जवळपास २४०० गोरेगावकर या स्नेहसंमेलनाला उपस्थित होते. कार्यक्रमासाठी गोरेगावातील संभाजी मैदान मिळवण्यासाठी शाळेचे माजी विद्यार्थी व स्थानिक नगरसेवक स्वप्नील टेंबवलकर यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचा मंच, तसेच ध्वनी, प्रकाश व मैदानावरील अन्य आवश्यक व्यवस्था माजी विद्यार्थी प्रसाद वालावलकर यांच्या ‘साई डेकोरेटर्स’ने सांभाळल्या.
संस्थेचे हितचिंतक महेश निवाते यांनी कार्यक्रमाचे पूर्ण चित्रीकरण आणि एलईडी स्क्रीनवरील प्रक्षेपण केले. प्रवेशद्वारापाशी मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या आणि निमंत्रितांचे स्वागत करण्यास शिक्षक व पालक गुलाबजल, अत्तर आणि फुले घेऊन सज्ज होते.
कार्यक्रमाचे निवेदन शाळेच्या माजी विद्यार्थिनी आणि ‘आकाशवाणी मुंबई’च्या एफएम वाहिनीसाठी लेखन, निवेदन व दिग्दर्शन करणाऱ्या माधुरी देवधर यांच्यासह शाळेच्या विद्यमान विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी साडेपाच वाजता मंडळाचे सर्व कार्यकारिणी सदस्य आणि प्रमुख अतिथी आशिष माने (नामवंत गिर्यारोहक) यांनी दीपप्रज्ज्वलन व सरस्वतीपूजन करून केली. सोबत प्रार्थना झाली. त्यानंतर प्रमुख अतिथींचे स्वागत व सत्कार करण्यात आला. विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले.
पुढील पाच तास विद्यार्थ्यांनी विविध संस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. ‘नूतन शिशुमंदिर’च्या तीन वर्षांच्या मुलांपासून दहावीपर्यंतचे एकूण ५५० विद्यार्थी, सर्व शिक्षक, मंडळाचे कर्मचारी व निवडक पालक यांनी सहभाग घेऊन ३१ भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी उपस्थितांना दिली. त्यात गायन, नृत्य, तबला जुगलबंदी, सामूहिक गायन, छोटे स्किट व त्याला जोडून संगीत नृत्य आदींचा समावेश होता. प्रमुख पाहुणे आशिष माने यांनी त्यांच्या यशस्वी एव्हरेस्ट मोहिमेबद्दल प्रेझेंटेशन देऊन मुलांमध्ये एक नवचैतन्य निर्माण केले.
संस्थेचे अध्यक्ष व सन्मित्र मंडळ विद्यामंदिराचे माजी शिक्षक विजय जोशी यांनी संस्थेच्या इतिहासाची आठवण करून देऊ पुढील वाटचालीबद्दल मार्गदर्शन केले. त्यांच्या हस्ते संस्थेचे संकेतस्थळ (
www.sanmitramandal.org) सुरू करण्यात आले. शाळेचे माजी विद्यार्थी राहुल व स्वप्नील काळे (दत्त स्नॅक्स) यांच्या सहयोगाने सर्व उपस्थितांना चटपटीत अल्पोपहार देण्यात आला. ठाणे जनता सहकारी बँक, जनकल्याण बँक, सारस्वत बँक व नॉव्हेल्टी स्टोअर्स यांनी या कार्यक्रमासाठी थोडे आर्थिक पाठबळ दिले.
संख्येच्या मर्यादेमुळे काही पालकांना व गोरेगावातील हितचिंतकांना प्रत्यक्ष कार्यक्रमाला बोलावणे शक्य झाले नाही. तसेच काही माजी शिक्षकांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे किंवा परदेशात असल्यामुळे हा कार्यक्रम खूप इच्छा असूनही बघता येणार नव्हता. या गोष्टी लक्षात घेऊन हा कार्यक्रम यू-ट्यूब चॅनेलवर ‘लाइव्ह’ प्रक्षेपित केला गेला.
(कार्यक्रमाचा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.) त्याची जबाबदारी तुषार कांबळी या माजी विद्यार्थ्याने सांभाळली. जगभरातील माजी शिक्षक व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा नुसताच आस्वाद घेतला असे नाही, तर उत्स्फूर्त प्रतिसादही दिला. २४ तासांच्या आत या चॅनेलला ९०० सबस्क्रायबर्स आणि ७५९०हून अधिक व्ह्यूज मिळाले.
संस्थेचे संयुक्त कार्यवाह प्रशांत आठले यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यात हातभार लागलेल्या सर्वांचे आभार मानले. आभारप्रदर्शन सुरू असताना माजी विद्यार्थी प्रथमेश कोंडेकरने (मान्यवरांना दिलेल्या स्मृतिचिन्हांच्या) छायाचित्राची तयार केलेली चित्रफीत एलईडी स्क्रीनवर दाखवण्यात आली. संघाचे जयप्रकाश नगराचे कार्यवाह दीपक मयेकर यांच्या सुरेल आवाजातील संपूर्ण वंदे मातरम् गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमाची मुख्य धुरा अॅडव्होकेट नारायण सामंत, नरेंद्र पुराणिक हे शाळेचे माजी विद्यार्थी व संस्थेचे खजिनदार अजित वर्तक यांनी सांभाळली असली, तरी संस्थेचे सर्व कार्यकारिणी सदस्य, तिन्ही विभागांचे मुख्याध्यापक नंदिनी भावे, वैशाली सावंत आणि सिद्धार्थ गव्हाळे, पर्यवेक्षक रेखा मोरे, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, तसेच सर्व विद्यार्थ्यांनी गेला महिनाभर केलेले परिश्रम आणि पालकांचा सक्रिय सहभाग व सहकार्यामुळेच हा भव्य कार्यक्रम यशस्वी व संस्मरणीय ठरू शकला.
संपर्क : अजित वर्तक - sanmitramg@gmail.com